IPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...

Rishabh Pant News: कार अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत संघापासून बराच काळ दूर राहिला आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींच्या संपर्कात असला तरीही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.   

सायली पाटील | Updated: Apr 5, 2023, 02:08 PM IST
IPL 2023 : ऋषभ पंतच्या जर्सीमुळं बीसीसीआयनं Delhi Capitals ला फटकारलं, Warning देत म्हटलं...  title=
IPL 2023 news BCCI slams Delhi captitals over rishabh pant jersey

IPL 2023 : सध्या आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचला असून, प्रत्येतक सामन्यानंतर त्यामधील लक्षवेधी क्षणांची बरीच चर्चा होताना दिसत आहे. एखाद्या खेळाडूची खेळी असो किंवा त्या सामन्यात प्रेक्षकांनी केलेला कल्ला असो. सोशल मीडियाच्या नजरेतून यापैकी एकही क्षण निसटत नाहीये. हो पण, इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे आयपीएलमधील घडामोडींवर BCCI सुद्धा करडी नजर ठेवून आहे. नुकतंच (IPL Delhi Capitals) दिल्लीच्या संघाला बीसीसीआयनं सुनावलेले खडे बोल पाहता हेच लक्षात येत आहे. (IPL 2023 news BCCI slams Delhi captitals over rishabh pant jersey)

IPL 2023 च्या एका सामन्यात दिल्लीचा संघ लखनऊविरोधात खेळला. यावेळी आपल्या संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्याप्रती संघाच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं संघाच्या डगआऊटमध्ये त्याची 17 क्रमांकाची जर्सी दर्शनीय स्थळी लावली. दिल्लीच्या संघाची ही कृती मात्र बीसीसीआयला अजिबातच रुचली नाही. 

संतप्त बीसीसीआय म्हणालं... 

दिल्लीच्या संघाकडून पंतची जर्सी अशा प्रकारे टांगणं BCCI ला अजिबातच पटलेलं नाही. किंबहुना या निर्णयावरही बीसीसीआयनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं 

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे आदर भावना तेव्हा व्यक्त केली जाते जेव्हा एखादी मोठी घटना घडलेली असते किंवा एखादं मोठं संकट ओढावलेलं असतं, फारफारतर जेव्हा खेळाडू निवृत्त होत असतो. इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. ऋषभ पंत पूर्णपणे बरा असून, तो दुखापतीतून सावरत आहे, ही वस्तुस्थिती मांडत बीसीसीआयनं दिल्लीच्या संघाला फटकारलं. संघाची ही कृती चांगल्या हेतूनं असली तरीही ती व्यक्त करण्याची पद्धत चुकल्यामुळं ही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

पंतच्या अडचणी संपणार तरी कधी? 

2022 च्या अखेरीस जबर अपघातातून बचावलेला पंत तूर्तास 2023 च्या क्रिकेट विश्वचषकामध्येही खेळू शकणार नाहीये. किंबहुना अभ्यासकांच्या मते येणारा काळही त्याच्यासाठी तितकाच कठीण असेल. यंदाच्या वर्षात तो क्रिकेटच्या मैदानात परतण्याची शक्यता अतिशय धुसर आहे. त्यामुळं संघातील त्याचं स्थानही अप्रत्यक्षरित्या धोक्यात आहे. सध्या केएल राहुल, ईशान किशन आणि संजू सॅमसन हे तीन खेळाडू पंतची जागा घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आता नेमकी त्याची ही संकटं संपणार कधी, याचीच क्रिकेटप्रेमीही वाट पाहत आहेत.