IPL 2021 Playoff | प्लेऑफच्या एका जागेसाठी या संघांमध्ये कडवी झुंज, कशी मिळणार एंट्री?

आयपीएलच्या 14 वा मोसम (IPL 2021) आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.

Updated: Oct 4, 2021, 08:56 PM IST
 IPL 2021 Playoff  | प्लेऑफच्या एका जागेसाठी या संघांमध्ये कडवी झुंज, कशी मिळणार एंट्री? title=

यूएई : आयपीएलच्या 14 वा मोसम (IPL 2021) आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. प्लेऑफमध्ये आधीच (CSK) चेन्नई, दिल्ली (DC) आणि  बंगळुरु (RCB) या तिन्ही संघांनी धडक मारली आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठीची (Playoff) एकच जागा शिल्लक आहे. तर या 1 जागेसाठी एकूण 3 संघ शर्यतीत आहे. या एका जागेसाठी (KKR) कोलकाता, मुंबई (MI) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या तिन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय.  (ipl 2021 for playoffs qualification mumbai indians rajasthan royals and kolkata knight riders this 3 teams fight for 4th spot )

या संघांना प्लेऑफमध्ये धडकण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित सामने चांगल्या आणि मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. कारण प्लेऑफसाठीची एका संघाची निवड ही ज्या निकषांवर होणार आहे, त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेट रनरेट. त्यामुळे साखळी फेरीतील अखेरचे काही सामने हे रंगतदार आणि थरारक होण्याची अपेक्षा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

कोलकाताने या मोसमातील 13 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कोलकाता 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाताचा पुढील सामना हा राजस्थान विरुद्ध होणार आहे. या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर प्लेऑफचं तिकीट मिळेल. मात्र राजस्थानही टक्कर देण्याच्या तयारीत असणार आहे.  

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

राजस्थानने 12 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थानच्या नावे 10 पॉइंट्स आहेत. राजस्थान पॉइंट्सटेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी राजस्थानला मुंबई आणि कोलकाता विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवावा लागेल.  

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स ही टीम आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईला मात्र या मोसमात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा धुसर झाल्या असल्या तरी जर तरच्या समीकरणावर आशा कायम आहेत.

मुंबईने 12 पैकी 5 सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. मुंबई 10 पॉइंट्ससब 7 व्या क्रमांकावर आहे. मुंबईला पुढील सामन्यात राजस्थान आणि हैदराबाद विरुद्ध खेळायचं आहे. या दोन्ही सामन्यात मुंबईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. 

इतकच नाही, तर मुंबईचं प्ले ऑफमधील भवितव्य हे राजस्थान विरुद्ध कोलकाता या सामन्यावर अवलंबून असणार आहे. या सामन्यात राजस्थानने कोलकाताला पराभूत केल्यास त्याचा मुंबईला फायदा होईल. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर मुंबईच्या समर्थकांचं लक्ष असणार आहे. 

या 2 संघांचा पत्ता कट 

सनरायजर्स हैदराबादचं या मोसमातील आव्हान संपल्यात जमा आहे. मात्र हैदराबाद दुसऱ्या संघाचं समीकरण बिघडवू शकतं. हैदराबादचा सामना मुंबई विरुद्ध होणार आहे. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवल्यास  मुंबईच्या असल्या नसलेल्या सर्व आशा या धुळीस मिळतील.  

पंजाबने या पर्वातील 13 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पंजाब 10 पॉइंट्ससह 5 व्या क्रमांकावर आहे. पंजाबचा या मोसमातील अखेरचा साखळी सामना हा चेन्नई विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईला पराभूत केल्यानंतरही पंजाब 12 पॉइंट्ससह प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाही.

पराभवानंतरही कोलकाताला प्लेऑफची संधी कायम

कोलकाता पुढील सामना हा राजस्थान विरुद्ध होणार आहे. कोलकाताने हा सामना गमावला तरीही त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता असणार आहे. मात्र कोलकाताचं भविष्य हे दुसऱ्या सामन्याच्या निकालावर असणार आहे. राजस्थानने मुंबईवर विजय मिळवल्यास, मुंबईने हैदराबादवर मात मिळवल्यास आणि चेन्नईने पंजाबला हरवल्यास या जर तर च्या शक्यतेवर कोलकाताला प्लेऑफमध्ये संधी मिळेल.

कोलकातासाठी हे जरी अशक्य असलं तरी क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पूर्ण होत नाही, तेव्हापर्यंत काहीही ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे प्लेऑफमध्ये कोणता संघ धडक मारणार, हे येत्या दिवसात निश्चित होईल.