IPL 2020 : अखेरच्या षटकात मुंबईनं दिल्लीवर मारली बाजी

मुंबईच्या संघानं दिल्लीला .... 

Updated: Oct 11, 2020, 11:43 PM IST
IPL 2020 : अखेरच्या षटकात मुंबईनं दिल्लीवर मारली बाजी  title=
छाया सौजन्य- ट्विटर

दुबई : आयपीएल 2020 IPL 2020 च्या यंदाच्या हंगामात काही सामन्यांमध्ये पराभव पचवणारा मुंबईचा संघ खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर गुणतालिकेत अग्रस्थानी पोहोचला. ज्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या याच खेळाडूंच्या बळावर मुंबईच्या संघानं दिल्लीलाही नमवलं आहे. 

अखेरच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्याच्या भागीदारीनं संघाला दिल्लीवर विजय मिळवून देण्यास मदत केली. मुंबईच्या संघानं दिल्लीला पाच गडी राखत आणि २ चेंडू शिल्लक ठेवत सामन्यात पराभवाच्या वाटेवर नेलं. दिल्लीकडून ६९ धावांची खेळी खेळणाऱ्या शिखर धवनच्या मेहनतीला यावेळी यश आलं नाही. 

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात फार चांगली नाही. सलामीवी पृथ्वी शॉ दोन आकडी धावांची मजलही मारु शकला नाही. तर, अजिंक्य रहाणेलाही १५ धावांवर तंबूत परतावं लागलं. फलंदाजांची एक फळी कोसळत असतानाच दुसरीकडे गब्बर शिखर धवन मात्र खेळपट्टीवर घट्ट पाय रोवून उभा होता. अखेर या संघानं मुंबईपुढं १६३ धावांचं आव्हान उभं केलं. 

 

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात क्विंटन डी कॉक चांगलाच फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. या सामन्यातही त्याचा असाच खेळ पाहायला मिळाला. अर्धशतकी खेळी खेळत त्यानं संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. ज्यानंतर पुढं सुर्यकुमार यादव यानंही अर्धशतच झळकावलं. हे दोन्ही खेळाडू अर्धशतकांनंतर लगेचच तंबूत परतले. दिल्लीनं दिलेल्या धावसंख्येता पाठलाग करत असताना हार्दिक पांड्या एकही धाव न करताच परत गेला. पाहता पाहता सोपं वाटणारं हे आव्हान अखेरच्या षटकापर्यंक पोहोचलं. पण, पोलार्ड आणि कृणाल पांड्याच्या समजुतदार खेळीनं अखेर मुंबईच्या पारड्यात विजयी मोहोर टाकली आणि संघ अग्रस्थान आपल्यापाशी ठेवण्यात यशस्वी ठरला.