INDvsSL: टीम इंडियाच्या नावावर झाले 'हे' लाजीरवाणे रेकॉर्ड

 भारत आणि श्रीलंका यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या वन-डे मॅचमध्येच टीम इंडियाला जोरदार झटका लागला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 10, 2017, 05:41 PM IST
INDvsSL: टीम इंडियाच्या नावावर झाले 'हे' लाजीरवाणे रेकॉर्ड  title=
Image Courtesy: BCCI Twitter

धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या वन-डे मॅचमध्येच टीम इंडियाला जोरदार झटका लागला आहे.

पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडिया ११२ रन्सवर ऑल आऊट झाली. धरमशालामधील लहान ग्राऊंडच्या तुलनेत हा खूपच कमी स्कोर आहे.

या मॅचमध्ये एकवेळ अशीही आली ज्यावेळी टीम इंडिया वन-डे इतिहासातील सर्वात कमी स्कोअरवर ऑल आऊट होण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी टीम इंडियाने ७ विकेट्स गमावत २९ रन्स केले होते. टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोअर श्रीलंकेविरोधात आहे. त्यावेळी भारतीय टीम ५४ रन्सवर ऑल आऊट झाली होती. 

श्रीलंकेविरोधातील पहिल्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगच खराब प्रदर्शन पहायला मिळालं. यामुळे अनेक खराब रेकॉर्ड्स टीम इंडियाच्या नावावर झाले आहेत. पाहूयात कुठले आहेत हे रेकॉर्ड्स...

१६ रन्सवर ५ विकेट्स:

केवळ १६ रन्सवर टीम इंडियाचे ५ विकेट्स गेले होते. अर्धी भारतीय टीम पेवेलियनमध्ये परतली होती. वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाच्या टॉप ५ने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर आहे. यापूर्वी १९८३ वर्ल्डकपमध्ये जिम्बाब्वेविरोधात खेळताना १७ रन्सवर अर्धी टीम पेवेलियनमध्ये परतली होती.

१० रन्सचा आकडा:

ही पाचवी वेळ आहे ज्यावेळी टीम इंडियाच्या पहिल्या पाच बॅट्समनपैकी कुणीही १० रन्सचा आकडा पार करु शकलं नाही. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे. यापूर्वी २०१२ मध्ये चेन्नईमध्ये पाकिस्तानविरोधात खेळताना भारतीय टीमची अशीच काहीशी अवस्था झाली होती.

११ रन्सवर ३ विकेट्स:

वन-डे मॅचेसमध्ये १० ओव्हर्स झाल्यावर २००१नंतर टीम इंडियाचा हा सर्वात कमी स्कोअर ठरला. यापूर्वी २००३मध्ये न्यूझीलंडविरोधात खेळताना टीम इंडियाने १० ओव्हर्समध्ये २ विकेट्स गमावत १६ रन्स केले होते. 

२ रन्सवर २ विकेट्स:

या स्कोअरवर भारतीय टीम पहिल्या ५ ओव्हरमध्ये २००१ नंतर पहिल्यांदाच पोहोचली आहे. 

१८ बॉल्समध्ये खातं उघडण्यात अपयश

दिनेश कार्तिकने तीन ओव्हर खेळत आपलं खातं उघडण्यातही अपयशी ठरला. ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळी भारतीय बॅट्समन १८ बॉल्स खेळला मात्र, खातं उघडू शकला नाही. यापूर्वी हा रेकॉर्ड एकनाथ सोलकर याच्या नावावर होता. त्याने १९७४मध्ये इंग्लंडविरोधात १७ बॉल्स खेळले मात्र, खातं उघडता आलं नाही.