रोहित-रायुडूची शतकं, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३७८ रनची गरज

रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूच्या शतकांमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.

Updated: Oct 29, 2018, 05:38 PM IST
रोहित-रायुडूची शतकं, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३७८ रनची गरज  title=

मुंबई : रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूच्या शतकांमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारतानं ५० ओव्हरमध्ये ३७७/५ एवढा स्कोअर केला आहे. रोहित शर्मानं त्याचं वनडेमधलं २१वं तर अंबाती रायुडूनं त्याचं तिसरं शतक पूर्ण केलं. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. यामध्ये २० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधली ही ७वी दीडशतकी खेळी केली. वनडेमध्ये सर्वाधिक दीडशतकं आणि त्यापेक्षा जास्त रन करण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहे.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवननं चांगली सुरुवात करून दिली. पण ७१ रनची पार्टनरशीप झाल्यावर धवन ३८ रनवर आऊट झाला. पहिल्या तिन्ही मॅचमध्ये शतक करणारा विराट कोहली या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विराट १६ रनवर आऊट झाला. यानंतर रोहित शर्माला अंबाती रायुडूनं चांगली साथ दिली. रायुडूनं ८१ बॉलमध्ये १०० रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.

गेल्या वर्षभरापासून फॉर्मसाठी झगडणाऱ्या धोनीनं १५ बॉलमध्ये २३ रन तर दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या केदार जाधवनं ७ बॉलमध्ये नाबाद १६ रन केले. रवींद्र जडेजानं ४ बॉलमध्ये नाबाद ७ रनची खेळी केली.

वेस्ट इंडिजच्या केमार रोचनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर अॅशले नर्स आणि केमो पॉवेलला प्रत्येकी १ विकेट मिळाली. पहिल्या वनडेमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर दुसरी वनडे टाय झाली तर तिसऱ्या वनडेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ५ वनडे मॅचची ही सीरिज १-१नं बरोबरीत आहे. ही मॅच जिंकणारी टीम सीरिजमध्ये अजेय आघाडी घेईल. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा