IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडिया तयार, अशी असेल प्लेइंग -11

भारतीय टीम पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी तयारॉ

Updated: Oct 21, 2021, 03:20 PM IST
IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडिया तयार,  अशी असेल प्लेइंग -11 title=

दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) पूर्ण तयारीत असल्याचं दिसून आलं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. याआधी भारताने इंग्लंडवर सहज विजय मिळवला होता. टीम इंडियाने या दुसऱ्या 'वॉर्म अप' मॅचमध्ये विजयावरून त्यांची तयारी पूर्ण असल्याचं दाखवून दिलं.

भारतीय संघाला 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (Ind vs pak) एक हायप्रोफाईल सामना खेळायचा आहे. टीम इंडिया कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकू इच्छिते. विराट कोहली आणि कंपनीसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही सराव सामने त्यांनी जिंकले आहे. सगळे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग -11 (Team india playing 11) जवळजवळ निश्चित झाली आहे.

रोहित-राहुलची सलामी

पहिल्या सराव सामन्यात विश्रांती घेतलेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रीजवर उतरला आणि त्याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 41 बॉलमध्ये 60 धावा केल्यानंतर तो स्वत: पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा सलामीवीर जोडीदार केएल राहुलने 39 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, अॅडम झांपा आणि केन रिचर्डसन यांच्या गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी केली. दोघांनाही क्रीजवर वेळ घालवायचा होता आणि त्यांनी ते शांतपणे केले. विजयाची खात्री झाल्यावर रोहित इतर फलंदाजांना संधी देण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यामुळे हे दोघेही सलामीची जबाबदारी सांभाळतील हे जवळपास निश्चित झाले आहे.

वरुण दबावाखाली, भुवी ट्रॅकवर

फिरकीपटू वरुण चक्रवर्ती इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला नव्हता, पण दुसऱ्या सराव सामन्यात तो मैदानावर उतरला. त्याने ही चांगली गोलंदाजी केली. अनुभवी भुवनेश्वर कुमार, जो गेल्या सामन्यात लय बाहेर असल्याचे दिसून आले होते, तो या सामन्यात ट्रॅकवर परतला.

गेल्या सामन्यात एक संधी गमावलेल्या सूर्यकुमारने ती चूक पुन्हा केली नाही. त्याने प्रत्येक शॉट व्यवस्थित खेळले. पुन्हा एकदा त्याने संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकला. त्याने 27 चेंडूत 38 धावा केल्या. कसोटी मात्र शेवटच्या क्षणी मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्याची होती. त्याने 8 चेंडूंच्या डावात आपली शैली दाखवली आणि रिचर्डसनच्या बॉलवर सिक्ससह सामना संपवला. या दोघांचा लय पाहून संघ व्यवस्थापन मधल्या फळीच्या ताकदीवर समाधानी झाला असेल.

सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकी गोलंदाजांना जागा दिली जाणार आहे. रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असल्याचे सांगितले जात आहे. पण रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या धारदार गोलंदाजीनंतर सलामीच्या फिरकीच्या पर्यायामध्ये आपला दावा ठामपणे ठेवला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आपले तीन गडी केवळ 11 धावांत गमावले. अश्विनने यातील दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अश्विनने डेव्हिड वॉर्नर (1) आणि मिशेल मार्श (0) यांना एकापाठोपाठ एक चेंडूंत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, वरुन चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर