IND vs ENG: विरेंद्र सहवागकडून इंग्लंडच्या पराभवाची खिल्ली, म्हणाला...

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर इंग्लंच्या पराभवानंतर एक मजेदार मीम शेअर करून खिल्ली उडवली आहे. 

Updated: Feb 17, 2021, 02:59 PM IST
IND vs ENG: विरेंद्र सहवागकडून इंग्लंडच्या पराभवाची खिल्ली, म्हणाला... title=

मुंबई: चेन्नईतील भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा पराभव झाला. भारतीय संघानं पहिल्या सामन्याचा बदला घेत 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंड संघाला मोठ्या पराभवाला तर सामोरं जावं लागलंच पण त्याच बरोबर सोशल मीडियावरही अनेक टीका आणि मीम्स व्हायरल झाले आहेत. इंग्लंडनं पहिल्या सामन्यात केलेली कामगिरी आणि दुसऱ्या सामन्यात झालेला दारूण पराभव अशी स्थिती आहे. 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर इंग्लंच्या पराभवानंतर एक मजेदार मीम शेअर करून खिल्ली उडवली आहे. खराब खेळपट्टीमुळे इंग्लंडला सामना गमवावा लागला असं सतत्यानं सुरू आहे. त्यानंतर आता हे मीम सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनलं आहे

व्हायरल होतंय मीम
वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर एक मीम शेअर केला आहे. या मीममध्ये इंग्लंडचा संघ पिच क्यूरेटरला काहीतरी विचारत आहे असं दिसतंय. चेन्नईतील मैदानापेक्षा मोटेरावर चेंडू कमी स्पिन होईल? क्यूरेटर उत्तरादाखल याची खात्री मी देऊ शकत नाही असं म्हणतो. विरेंद्र सेहवागनं ट्वीट केलेलं हे मीम सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

 

भारतीय संघानं पुढच्या कसोटी सामना खेळण्यासाठी रणनिती तयार करायला सुरुवात केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 24 फेब्रुवारीपासून मोटेरा इथे 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने डे-नाईट खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी विशेष तयारी करणं गरजेचं असणार आहे. याशिवाय प्लेइंग इलेवनमध्ये आता तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणाला नव्याने संधी मिळणार हे पाहाणं देखील तितकच औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. भारतीय संघाने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत करून नेत्रदीपक विजय नोंदवला. पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी पराभूत करत पराभवाचा सामना केल्याने दुसर्‍या सामन्यात भारताला जबरदस्त पुनरागमन करावे लागले. या सामन्यात इंग्लंडवरील तिन्ही विभागांत भारतीय संघ इंग्लंडवर भारी पडला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.