टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट गांभीर्याने घेत नाहीये, 'या' दिग्गजाचा आरोप

न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर (Team India) सडकून टीका केली जात आहे. 

Updated: Nov 2, 2021, 06:58 PM IST
टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट गांभीर्याने घेत नाहीये, 'या' दिग्गजाचा आरोप title=

मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर (Team India) सडकून टीका केली जात आहे. त्यात आणखी भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) टीम इंडियावर मोठा आरोप केला आहे. टीम इंडियाचं मर्यादित षटकांच्या खेळाप्रती असलेला हलगर्जीपणा हा त्यांच्या टी 20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीचं प्रमुख कारण आहे, असं अक्रमचं म्हणनं आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपआधी इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळली असल्याचंही अक्रमने नमूद केलं. तसेच भारताचे प्रमुख खेळाडू हे आयपीएलमध्ये प्रामुख्याने भाग घेतात. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिस्पर्धी संघांचं आव्हान पेलण्यासाठी अशा स्पर्धा पुरेशा नसल्याचंही अक्रमने म्हंटलं. (icc t 20 world cup 2021 Team India does not take international series seriously says pakistan former player wasim akram)

अक्रम काय म्हणाला?

"टीम इंडियाच्या सर्व अनुभवी खेळाडूंनी अखेरची वनडे मालिका ही मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळली होती. सध्या नोव्हेंबर महिना सुरु आहे. यावरुन टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गांभीर्याने घेत नसल्याचं सिद्ध होतंय. खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळणंच पुरेसं वाटतं. तुम्ही तितकं लीग क्रिकेट खेळू शकता जितकं तुम्हाला वाटतं. जेव्हा तुम्ही लीग क्रिकेटमध्ये खेळता तेव्हा तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी संघातील एक किंवा दोन चांगले गोलंदाज असतात. मात्र जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्यासमोर चार ते पाच चांगले गोलंदाज असतात", असं अक्रमने नमूद केलं. अक्रम ए स्पोर्ट्ससह बोलत होता. यावेळस त्याने ही प्रतिक्रिया दिली.

आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20 आणि वनडे मालिका खेळली होती. मात्र या दोन्ही मालिकांमध्ये सिनिअर खेळाडू नसल्याच्या बरोबर होते. कारण तेव्हा टीम इंडियाचा प्रमुख संघ हा इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त होता.  

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाचं कारण काय?

अक्रमने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवाचं कारणही सांगितलं. या सामन्यातील टॉस पराभवाचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं. तसेच सोबत रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यावरुन संताप व्यक्त केला. "हा सर्वोत्तम सामना नव्हता. संपूर्ण सामना हा एकतर्फी झाला. टीम इंडियाने या सामन्यात अनेक चुका केल्या. तसेच 'करो या मरो'च्या सामन्यात रोहितच्या बॅटिंग पोझिशनमध्ये बदल करणं ही सर्वात मोठी चूक होती", असं अक्रमने स्पष्ट केलं.