भारतीय क्रिकेट टीमच्या माजी सदस्याचं निधन

नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा देणारे बीसीसीआयचे मॅनेजर डॉ. एमव्ही श्रीधर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. 

Updated: Oct 30, 2017, 11:43 PM IST
भारतीय क्रिकेट टीमच्या माजी सदस्याचं निधन  title=

हैदराबाद : नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा देणारे बीसीसीआयचे मॅनेजर डॉ. एमव्ही श्रीधर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. हैदराबादमध्ये घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ५१ वर्षांचे श्रीधर चार वर्ष बीसीसीआयचे मॅनेजर होते. मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

श्रीधर १९९०च्या काळामध्ये हैदराबादच्या टीमचे आधारस्तंभ होते. ओपनिंग बॅट्समन असलेल्या श्रीधर यांनी ९७ फर्स्ट क्लास मॅचमध्ये ४८.९१च्या सरासरीनं ६,७०१ रन्स बनवल्या. ३६६ रन्स हा श्रीधर यांचा सर्वाधिक स्कोअर होता. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी हरभजन सिंग आणि अॅन्ड्र्यू सायमंड्स यांच्यामध्ये झालेल्या वादावेळी श्रीधर भारतीय टीमचे मॅनेजर होते. विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावेळीही श्रीधर यांनाच पाठवण्यात आलं होतं.

वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी संजय बांगर प्रशिक्षक असताना खेळाडूंचं मानसिक संतूलन ठीक ठेवण्याची जबाबदारी श्रीधर यांच्यावर सोपवण्यात आली होती. याचबरोबर श्रीधर हैदराबाद क्रिकेट संघाचे सचिवही होते. श्रीधर यांच्यावर अनेक क्लबशी जोडले गेल्याचा आरोपही झाला. हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या मॅनेजर पदाचा राजीनामा दिला.