बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?

आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.  

राजीव कासले | Updated: Nov 21, 2023, 04:57 PM IST
बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?  title=

Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि टीम इंडिया (Team India) आता नव्या क्रिकेट मालिकांसाठी सज्ज  झालीय. येत्या 23 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia T20 Sereis, खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. विश्वचषकात खेळलेल्या दिग्गज खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे. 

या सहा खेळाडूंवर अन्याय
दिग्गज खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी देत असताना बीसीसीआयने सहा खेळाडूंकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून या खेळाडूंना टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न क्रिकेच चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

संजू सॅमसन 
आशिया कपनंतर विश्वचषक स्पर्धेतही संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करण्यात आलं. दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळेल अशी शक्यता होती. पण यावेळीही त्याला डावलण्यात आलं. गेल्या 8 टी20 सामन्यात संजूने दोन अर्धशतकं लगावली आहेत. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल्या जागी मधल्या फळीत संजू सॅमनस एक आक्रमक फलंदाज म्हणून उपयुक्त ठरू शकला असता. पण संघ निवडताना त्याच्या नावाचा विचारही करण्यात आला नाही. विश्वचषकात संजू सॅमनसला राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आलं. पण केएल राहुलचं पुनरागमन होताच संजूला सुट्टी देण्यात आली.

युजवेंद्र चहल
कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा नसल्याने युजवेंद्र चहलला संधी मिळणं जवळपास निश्चत होतं. पण बीसीसीआयने यावेळीही युजवेंद्र चहलकडे दुर्लक्ष केलं. एशिया कपनंतर युजवेंद्र चहलला विश्वचषकासाठी संघात बोललं जातं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविज यांनी तसे संकेतही दिले होते. पण विश्वचषक सोडा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतूनही चहलला डावलण्यात आलंय. चहलने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 96 विकेट घेतल्यात.

भुवनेश्वर कुमार
IPL 2023 स्पर्धेतल्या 14 सामन्यात 16 विकेट आणि नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 7 सामन्यात 16 विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तर बीसीसीआय पार विसरुनच गेलीय. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार जोडीने 
टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिलेत. पण भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहेत. टी20 मालिकेत शमी, बुमराह, सिराज नसताना अनुभवी भुवनेश्वर कुमारला संधी का दिली नाही हे कोडच आहे. 

राहुल त्रिपाठी
युवा आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठीने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईकरेट 145 इतका जबरदस्त आहे. राहुल त्रिपाठी शेवटचा T20 सामना याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. पण त्यानंतर त्याला संधीच देण्यात आलेली नाही.

दीपक हुड्डा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 स्पर्धेत दीपक हुड्डा आपल्या राजस्थान संघातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 135 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्यात. टी20त दीपक हुड्डाचा स्ट्राईक रेट जवळपास 148 इतका आहे. 

दीपक चाहर
दीपक चाहरनेही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 5 सामन्यात तब्बल 10 विकेट घेतल्यात. नव्या चेंडूने विकेट घेण्यात दीपक चाहरची खासीयत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताा कर्णधार धोनीने चाहरला पुरेपर संधी दिलीय. अशात बीसीसीआयने टीम इंडियात संधी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.