IND vs AFG : "काल त्याच्याशी बोललो तेव्हा..."; विराटने शतक ठोकताच खास मित्राने दिली प्रतिक्रिया

कोहलीच्या बॅटमधून तब्बल 1020 दिवसांनी शतक झळकलं आहे

Updated: Sep 8, 2022, 11:14 PM IST
IND vs AFG : "काल त्याच्याशी बोललो तेव्हा..."; विराटने शतक ठोकताच खास मित्राने दिली प्रतिक्रिया title=

Asia cup 2022 : भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर शतक झळकावले आहे. आशिया कप 2022 (asia cup 2022) मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने 61 चेंडूत 122 धावांची (virat kohli century) नाबाद खेळी खेळली. कोहलीच्या बॅटमधून तब्बल 1020 दिवसांनी शतक झळकलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक केले होते. यासोबतच कोहलीचे गेल्या 60 डावातील हे पहिले शतक आहे.

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 71 वे शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत, कोहलीच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 100 शतके आहेत.

विराटच्या शतकानंतर सर्व क्रिकेटपटू, क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यावर त्याचा खास मित्र आणि आरसीबीचा माजी  सहकारी एबी डिव्हिलियर्सने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

 "काल जेव्हा मी त्याच्याशी बोललो तेव्हा मला कळले की काहीतरी शिजत आहे," असे एबीने म्हटलं आहे.

विराट कोहलीची बहीण भावना कोहलीने इंस्टा पोस्टमध्ये सिंहासारखी गर्जना केली असं म्हटलं आहे. तर  हरभजन सिंगने, "शाबास चॅम्पियन कोहली. तुझे शतक पाहून आनंद झाला," असे म्हटलं आहे. सुरेश रैनाने, "T20I क्रिकेटमधलं पहिलं शतक, कोहलीसाठी खूप आनंद झाला आहे. तू त्याच्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. अशा अप्रतिम खेळीसाठी खूप खूप धन्यवाद," असं म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने कर्णधार केएल राहुलसोबत डावाची सुरुवात केली. या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. मार्च 2021 नंतर कोहली टी-20 मध्ये सलामीवीर म्हणून दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने 40 चेंडूत 62 धावा करणाऱ्या राहुलसोबत 119 धावांची भागीदारी केली.

कोहलीने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात करत 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने खेळाच्या 19व्या षटकात फरीद अहमदच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर त्याने हेल्मेट काढले आणि त्याच्या चेनचे चुंबन घेतले. फझलहक फारुकीच्या चेंडूवर दोन षटकार आणि एक चौकार मारून त्याने भारताला २०० धावांच्या पुढे नेले. कोहलीने 61 चेंडूत 122 धावा करत नाबाद राहिला, त्याने 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले.