महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा वादाच्या भोव-यात; पैलवानांवरच होणार कारवाई

महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी बाळासाहेब लांडगे आयोजित करणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघानं दिला आहे. 

Updated: Nov 26, 2022, 07:06 PM IST
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा वादाच्या भोव-यात; पैलवानांवरच होणार कारवाई  title=

Maharashtra Kesari Kusti, पुणे :  महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची(Maharashtra Kesari Kusti Parishad) नवी समिती बरखास्त केली. या निर्णयाविरोधात  कुस्तीगीर परिषदेचे  सरचिटणीस बाळासाहेब लांडगे(Balasaheb Landge ) यांनी हाय कोर्टात(High Court) धाव घेतली होती.  हाय कोर्टाने लांडगे यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. यांनतर त्यांनी स्पर्धेची घोषणा देखील केली होती. मात्र, आता लांडगेंच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाल्यास कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघाने दिला आहे.  कुस्तीगीर परिषदेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी बाळासाहेब लांडगे आयोजित करणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघानं दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघानं बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीर परिषदेला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. तुमची संलग्नता का रद्द करण्यात येऊ नये असा प्रश्न या नोटिसमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. 

त्याचबरोबर यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन भारतीय कुस्ती महासंघाकडून स्थापन करण्यात आलेल्या अस्थाई समितीमार्फतच होईल असंही महासंघाने जाहीर केले आहे.  या अस्थाई समितीचे सदस्य योगेश दोडके यांनी यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार असल्याच जाहीर केले.

काय आहे कुस्ती परिषदेचा वाद?

भारतीय कुस्ती संघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती रद्द केली होती. त्यानंतर भारतीय कुस्ती संघाकडून भाजप खासदार रामदास तडस यांच्या अधघ्यक्षतेखाली नवीन समिती नियुक्त करण्यात आली होती. हायकोर्टाने कुस्तीगीर परिषदेच्या नवनियुक्त समितीला बरखास्त केली. यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्याआयोजनावरुन दोन्ही गटांमध्ये वाद पेटला.