Mahashivratri 2023: भगवान शंकराला का वाहतात बेलाची पानं? बेलाची पानं वाहताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर...

Mahashivratri 2023 Know Why Bel Patra Is Offered To Lord Shiva: यंदा महाशिवरात्री ही 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते ज्यात बेलाच्या पानांना फार महत्त्व असतं.

Updated: Feb 14, 2023, 09:21 PM IST
Mahashivratri 2023: भगवान शंकराला का वाहतात बेलाची पानं? बेलाची पानं वाहताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर... title=
benefits of offering belpatra to shiva

Mahashivratri 2023 Know Why Bel Patra Is Offered To Lord Shiva and Rules: यंदाच्या वर्षी महाशिवरात्री (Mahashivratri 2023) 18 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून उपवास ठेवतात. तर विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि उपवास ठेवतात. या दिवशी शंकराच्या मंदिरांमध्ये (Lord Shiva) भाविकांची मोठी गर्दी असते. या दिवशी शंकराची मोठ्या उत्साहामध्ये पूजा केली जाते. या दिवशी अनेकजण रुद्राभिषेकही करतात. मात्र भगवान शंकराची पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. यामध्ये थोडीशी चूक झाली तरी त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आज आपण शंकराला बेलाची पानं कशी वाहतात याबद्दल जाणून घेणार आहोत.

बेलाचं पान का वाहिलं जातं?

पौराणिक कथांमध्ये बेलाच्या पानासंदर्भातील एक कथा आढळून येते. यानुसार, समुद्रमंथनावेळी पृथ्वीवर विष निर्माण झालं. या विषामुळे पृथ्वीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला. यामुळे पृथ्वीला वाचवण्यासाठी समुद्रमंथनातून निर्माण झालेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले. यामुळे भगवान शंकरांचा कंठ नीळा पडला. यावरून भगवान शंकराला 'नीळकंठ' हे नाव पडलं.

पृथ्वीला वाचवण्यासाठी प्यायलेल्या या विषाच्या प्रभावामुळे भगवान शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. भगवान शंकराच्या शरीरामधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली. भगवान शंकरांची ही अवस्था पाहून अन्य देव मदतीसाठी धावून आले. सर्व देवांनी भगवान शंकराच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवली. त्यानंतर देवांनी शंकराच्या डोक्यावर पाण्याचा अभिषेक केला. यामुळे भगवान शंकराचं डोकं शांत झाले. बेलाची पाने ही नैसर्गिकपणे थंड असतात. या पानांचा उपयोग शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास केला जातो. म्हणूनच शिवपूजेवा बेलाच्या पानांना विशेष महत्त्व असते.

बेलाची पानं वाहताना काय काळजी घ्यावी?

> भगवान शंकराला बेलाची पानं नेहमी अनामिका, मध्यमा आणि अंगठ्याच्या मदतीने अर्पण केली जातात. धार्मिक मान्यांनुसार शंकराला बेलाची पानं अर्पण केल्यानंतर थोडसं पाणी नक्की वाहिलं पाहिजे. 

> भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण केल्याने धन, धान्यांमध्ये वृद्धि होते असं मानलं जातं. ज्या महिला शंकराला बेलाची पानं अर्पण करतात त्याचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि समाधानी होतं. 

> भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण करताना त्यावर राम लिहावे. ताजी बेलाची पानं उपलब्ध नसतील तर जुनी पानं शंकराला किंवा शिवलिंगावर अर्पण करु नयेत. जुनी पानं अर्पण करणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. शिवलिंगावर बेलाची पानं अर्पण करण्याआधी शिवलिंगावर पाणी अर्पण करावं.

> ज्योतिष शास्त्रानुसार चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्येच्या तिधीला बेलाची पानं तोडू नयेत. तसेच संक्रांत आणि सोमवारीही बेलाची पानं तोडू नये.

बेलाची पानं अर्पण करताना म्हणायचं मंत्र

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम्

त्रिजन्मपाप संहारं एक बिल्वं शिवार्पणम्

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)