भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा झाली कमाल, एकाच मालिकेत 5 खेळाडूंचं पदार्पण

IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. धर्मशाला स्टेडिअमवर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात डाव्या हाताचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने पदार्पण केलं. याबरोबरच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा अशी कमाल झाली आहे.

| Mar 07, 2024, 19:06 PM IST
1/7

धर्मशाला इथं भारत आणि इंग्लंडदरम्यानचा शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात डाव्या हाताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याबरोबरच भारतीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदाच अशी कमाल झालीय. एकाच कसोटी मालिकेत 5 खेळाडूंनी पदार्पण केलंय. 

2/7

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून रजत पाटीदराने सर्वात पहिलं पदार्पण केलं. त्यानंतर सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलने राजकोट कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाज आकाश दीपची टीम इंडियात एन्ट्री झाली. आणि आता धर्मशाला कसोटीत देवदत्त पडिक्कलचा डेब्यू झाला. 

3/7

याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 2020-21 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताच्या 5 खेळाडूंनी पदार्पण केलं होतं. 4 कसोटी सामन्यांची हि मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेत शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने पदार्पण केलं होतं. 

4/7

सर्फराजन खानने राजकोट कसोटीत पदार्पण करत आपली निवड किती योग्य आहे हे दाखवून दिलं. सर्फराजने आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. त्याने 48 चेंडूत 50 धावा केल्या. शिवाय कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. राजकोट कसोटीत सर्फराजने पहिल्या जावात 62 तर दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या.

5/7

ध्रुव जुरेलने कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. त्याने दमदार विकेटकिपिंग केली, पण त्याचबरोबर फलंदाजीत ही त्याने मोलाचं योगदान दिलं. रांची कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने पहिल्या डावात 90 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात शुभमन गिलबरोबर नाबाद 39 धावा करत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 

6/7

रांची कसोटीत टीम इंडियाचा आणखी एक हिरो ठरला तो म्हणजे वेगवान गोलंदाज आकाश दीप. आकाश दीपने आपल्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्या.  एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्याला 3 वर्षांसाठी क्रिकेट सोडावं लागलं होतं. 

7/7

दरम्यान, धर्मशाला कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसात भारताने वर्चस्व गाजवलंय. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांवर ऑलआऊट झाला. तर पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 1 विकेट गमावत 135 धावा केल्यात. रोहित शर्मा 52 तर शुभमन गिल 26 धावांवर नाबाद आहे.