वसईकरांचा 'जीव' खड्ड्यात!

वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 22, 2013, 07:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वसई
वसईत पावसाळ्यात पडलेले खड्डे आता किलर स्पॉट ठरतायत. एव्हरशाईन परिसरातल्या या खड्ड्यांनी आशा ढमढेरे या महिलेचा बळी घेतलाय. दुर्दैवाची बाब म्हणजे माणिकपूर पोलिसांनी मृत महिलेलाच तिच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलंय...
खड्डे बुजवण्याच्या नावाखाली महापालिकेने मलमपट्टी सुरू केली. महापालिकेला हे सुचलं एक बळी गेल्यावर. या रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून आशा ढमढेरे या महिलेचा बळी गेला. तर दक्षा नागडा ही महिला गंभीर जखमी झाली. आणखी संतापाची गोष्ट म्हणजे ही मृत महिलाच तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. पण ज्यांच्या गलथान कारभारामुळे हे खड्डे वेळीच बुजवले गेले नाहीत, त्या पीडब्ल्यूडीच्या अधिका-यांवर कारवाई होणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी पोलिसांनी महिनाभरापूर्वीच पत्र दिल्याचं सांगण्यात येतंय. मग त्यानंतरही पीडब्ल्यूडी गप्प का बसलं?
खड्ड्यांमुळे होणा-या अपघातांना जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कधी कारवाई करणार, असा संतप्त सवाल वसईकर करत आहेत.पालिकेने खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी सुरू केलीय. पण हा रस्ता ज्यांच्या अखत्यारीत येतो, ते पीडब्ल्यूडीचे अधिकारी अजूनही ढिम्म बसून आहेत. एका महिलेचा बळी घेणारे हे किलर खड्डे कधी बुजणार? की त्यासाठी प्रशासनाला आणखी बळी हवेत..?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.