राज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर

राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 12, 2013, 11:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या उशीराने धावत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय.
जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिंगणापूर नाका येथे पुलावर पाणी आलेय. या पाण्यात एक जीप वाहून गेली.

कोकणात रत्नागिरीत चांदेराई , चिपळूण, खेडमध्ये नद्यांना पूर आलाय. येथील नद्यांचे पाणी केव्हाही बाजारपेठेत घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्तक राहण्याच्या सूचना केल्यात. खेडमधील जगबुडी नदीला पूर आलाय. खेड बाजारपेठेत पुराचे पाणी घुसलंय. येथील ३० गावांचा पुरामुळे संपर्क तुटलाय. वासिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
तर रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. महाडमध्ये संततधार सुरूच असून महाड नगरपालिकेने येत्या ७२ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सावित्री, गांधारी आणि काळ या तीन नद्या दुथडी भरून वाहात आहेत. तर वाळण, बिरवाडी भागातील नदी नाल्यांनी उग्र रूप धारण केल्याचे चित्र आहे.
रोहा परिसरात बुधवारी सकाळपासूनच जोर धरलेल्या पावसाने रोहेकरांना झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कुंडलिका नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.