राज ठाकरे महाराष्ट्र काबीज करू शकतील?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्याच जाहीर सभेत ठाकरी शैलीत अनेकांवर तोफ डागली.

Updated: Feb 13, 2013, 03:47 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्याच जाहीर सभेत ठाकरी शैलीत अनेकांवर तोफ डागली. मात्र त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूतीसाठी हा दौरा काढला असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले... मनसेने मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरात आपली पकड चांगलीच मजबूत केली आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हवी तशी पकड अजून तरी मनसेला घेता आली नाही.
कोल्हापूरमध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला तुफान गर्दी दिसून आली. मात्र अजूनही प. महाराष्ट्रात मनसेला पाय रोवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताना आपली पकड मजबूत करणार का याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना मात्र राज ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांना जाहीर आव्हान देत पुन्हा आमची शाखा निर्माण होताना कार्यकर्त्यांना जर अडवलंत, तर तिथल्या तिथे गाडून टाकू असा इशारा दिला. आमच्या शाखा, कार्यालये निर्माण करताना आडवे याल, त्यांच्या घरच्यांनाही धमक्या जातील, हे याद राखा.