मनसेचे अमरावतीतही इंडियाबुल्समध्ये खळ्ळ-खट्याक

अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सवर केलेल्या टीकेनंतर मुंबईनंतर आता अमरावतीतही त्याचे पडसाद पडले आहे. अमरावतीतील इंडियाबुल्सच्या क्षेत्रीय कार्यालयावर मनसेच्या २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केला

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 25, 2013, 01:18 PM IST

www.24taas.com, अमरावती
अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सवर केलेल्या टीकेनंतर मुंबईनंतर आता अमरावतीतही त्याचे पडसाद पडले आहे. अमरावतीतील इंडियाबुल्सच्या क्षेत्रीय कार्यालयावर मनसेच्या २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केला.

यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि कार्यालयाची तोडफोड केली. येथील शोभेच्या काचाही मनसैनिकांनी फोडल्या. अमरावतीचे पाणी इंडियाबुल्सला दिले जाते, त्यामुळे अशा प्रकल्पांची गरज नाही. इंडियाबुल्स विरोधात आंदोलन झालेच पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.
काल राज ठाकरे यांनी अमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. यावेळी मनसैनिकांनी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातील सभांचा काल शेवटचा टप्पा होता. सभेपूर्वीच इंडियाबुल्स कंपनीच्या प्रकल्पाला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. आपल्या जाहीर सभेतही राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सला लक्ष्य केलं होतं. जनतेचं प्यायचं पाणी आणि शेतीसाठी लागणारं पाणी पळवून ते इंडियाबुल्सला पुरवलं जातं, असं राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं होतं. जनतेच्या तोंडचं पाणी पळवून ते ज्या प्रकल्पांना वापरलं जातं, त्या इंडियाबुल्ससारख्या प्रकल्पांविरोधात उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी केला.

मुंबईत पाच जणांना अटक
दरम्यान मुंबईतील इंडियाबुल्स हल्ला प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना भोईवाडा कोर्टात हजर केले जाणार आहे.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यांचे पडसाद मुंबईत ताबडतोब उमटल्याचं दिसून आलं होते. काही अज्ञात इसमांनी कार्यकर्त्यांनी परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. १० ते १२ जणांनी हा हल्ला केला आहे. हे कार्यकर्ते मनसेचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.