महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 30, 2014, 10:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इचलकरंजी
महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.
राज्यात टोलसंस्कृती शरद पवारांनीच आणल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. तर उपमुख्यमंत्री असताना आपण टोल रद्द केल्याचा दावा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केला. शरद पवार लोकसभेत निवडून येणार नाहीत म्हणूनच ते राज्यसभेवर जात असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. तर बीडमधून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं. उद्धव ठाकरेंनीही पवारांचा समाचार घेतला. महायुतीच्या पांडवांमध्ये पवारांसारखा दु:शासन नको असा टोला त्यांनी लगावला.

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर सडकून टीका केली. लोकसभेत निवडून येणार नसल्याची खात्री असल्यानंच पवार राज्यसभेवर गेले. तर अजित पवारांना थेट बीडमधून लढण्याचं आव्हान मुंडेंनी दिलं. तर राहुल गांधी आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नसल्याचा टोला हाणलाय.
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतलाय. सिंचनाचे पैसे राष्ट्रवादीनंच खाल्ले असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय.
महायुतीच्या महासभेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना फटकवण्यासाठी शेट्टींनी `शेतकऱ्यांचा आसूड` महायुतीच्या नेत्यांच्या हातात दिला.
इचलकरंजीतल्या महायुतीच्या महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रस-राष्ट्रवादीचं सरकार गाडण्याचा निर्धार केला. महायुतीच्या पाच पांडवांची वज्रमूठ एकत्र आली असून कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचंच असा संकल्प त्यांनी सोडला. अशोक चव्हाणांना क्लीन चिटच द्यायची होती तर राजीनामा कशाला घेतला असा सवालही त्यांनी केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.