`झी २४ तास`नं चारा छावणीची `बोगसगिरी`केली बंद

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 29, 2012, 09:51 AM IST

www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. दिघंचीतल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चारा छावणीतील बोगसगिरी शासनाच्या तपासणीत उघड झालीए. त्यामुळे चारा छावणी बंद करण्याची कारवाई करण्यात आलीय.
आटपाडीमधील दिघंचीतल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चारा छावणीतील बोगसगिरी शासनाच्या तपासणीत उघड झालीय. इथल्या चारा छावणीत शासनदरबारी १५०० जनावरांची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात ८२४ जनावरं इथं आढळली. चारा आणि पेंड वाटपातही गोलमाल असून दुष्काळग्रस्तांच्या कार्डवर १५ किलो चाऱ्याची नोंद करायची आणि चारा मात्र १३ किलोच देण्याचा उद्योग इथं सुरू असल्याचं समोर आलंय. पेंड तर आठ-आठ दिवस दिलीच जात नाही. तसंच पशुधनाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करण्यात आलेलं नसल्याचं उघड झालंय. जनावरांच्या उपचारासाठी डॉक्टरही वेळेवर येत नाही. आणि डॉक्टर आले तर अर्धी औषधं आपली आणि उरलेली शेतकऱ्यांना बाहेरून विकत आणण्यास सांगितलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनीही चीड व्यक्त केली होती.
या चारा छावणीतील गैरकारभाराविषयीचं वृत्त ‘झी २४ तास’नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि ही चारा छावणी बंद करण्याची कारवाई करण्यात आल्याचं प्रभारी तहसीलदार डी. वाय. मुल्ला यांनी सांगितलंय. ‘झी २४ तास’च्या वृत्तानंतर दिघंचीतल्या चारा छावणीवर ही कारवाई झाली असली तरी अन्य ठिकाणच्या चारा छावण्यांचीही परिस्थिती तपासायला हवी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.