बालिकेचा दिला जात होता नरबळी, चौघांना अटक

यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव गावक-यांनी उधळून लावलाय. त्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीए.

Updated: Nov 26, 2012, 11:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव गावक-यांनी उधळून लावलाय. त्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीए. मुख्य म्हणजे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंच्या मतदारसंघातच अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीए...
यवतमाळमधल्या घाटंजी तालुक्यातल्या मुरली इथल्या मारुती मंदिर परिसरात रात्रीच्या अंधारात एका बालिकेचा नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता. गावक-यांनी रडण्याचा आवाज ऐकल्यामुळे नरबळी देण्याचा डाव उधळला गेला. त्यावेळी गावक-यांनी दोघांना पकडलं मात्र इतर तिघं बालिकेला घेऊन पसार झाले. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी थातुरमातुर चौकशी केली आणि आरोपींना सोडून दिलं.
मात्र याच परिसरातील 7 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. आणि तिलाच नरबळीसाठी पळवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केलीए. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पुन्हा अटक करून त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणाचा तपास थांबवल्यामुळे गावक-यांमधून रोष व्यक्त होतोय. नरबळीचा प्रयत्न करणा-यांनी मंदिर परिसरात एक खोदलेला खड्डा आणि पूजेचं साहित्य सापडलंय.
त्याचवेळी आरोपींची चौकशी झाली असती तर मुलगी मिळाली असती असं गावकरी म्हणताएत. आता या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी केलीए. तर नरबळीची ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झालं पाहिजे असल्याची प्रतिक्रिया मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शिवाजीराव मोघेंनी दिलीए.