‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!

शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2013, 10:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...
मुंब्र्यातली ‘बानो’ इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. सगळे जण साखर झोपेत असताना भल्या सकाळीच ही बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे मृतांचा आकडा प्रचंड प्रमाणात असण्याची भीती होती. पण, या बिल्डिंगमधले अनेक जण मृत्यूच्या तावडीतून सुटले ते एका आठ वर्षांची चिमुरडी आसमा आणि तिच्या वडिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे... सकाळी साडे सहा वाजताच घरातली माती पडत असल्याचं छोट्या आसमाच्या लक्षात आलं आणि तीनं आपल्या वडिलांना म्हणजेच मोहम्मद अन्सारीला उठवलं. भिंतींना भेगा पडत असल्याचं मोहम्मद अन्सारी यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पटापट बिल्डिंगमधल्या सगळ्यांना उठवलं आणि पटापट बाहेर पडायला सांगितलं.
‘बानो’ इमारतीत जवळपास दीडशे लोक रहात होते. त्यात लहान मुलांची संख्या जास्त होती. अन्सारींनी सांगितल्यावर लगेच बहुतेक लोक जीव मुठीत धरुन बिल्डिंगमधून बाहेर पडले. या दूर्घटनेत मोहम्मद अन्सारीचं घरही नेस्तनाबूत झालंय. पण अनेकांचे प्राण वाचल्यानं मोहम्मद समाधानी आहे. त्याचबरोबर फसवणाऱ्या बिल्डरवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.

आसमा आणि मोहम्मदच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंच. पण त्याचबरोबर महत्त्वाची ठरली ती या बापलेकींची सतर्कता...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.