टोल न भरताच पुढे निघाला राज ठाकरेंचा ताफा!

पुणे दौऱ्यासाठी निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी, खालापूर आणि उर्से टोल नाक्यावर टोल न भरताच रवाना झाले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2014, 12:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई/पुणे
पुणे दौऱ्यासाठी निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी, खालापूर आणि उर्से टोल नाक्यावर टोल न भरताच रवाना झाले.
मुंबईतून पुण्याला निघालेल्या कोणत्याही टोलनाक्यावर राज ठाकरे यांना टोल भरावा लागला नाही. टोल कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यातल्या सर्व गाड्या टोल न भरताच जाऊ दिल्या. राज ठाकरेंचा ताफा वगळता इतर सर्वसामान्यांच्या गाड्यांना मात्र टोल भरावा लागत होता. राज ठाकरेंना टोल माफी मात्र सर्वसामान्यांनी काय घोडं मारलंय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.
मनसेचा शुक्रवारी पुण्यात मेळावा होतोय. मुंबईतून सकाळी साडे नऊच्या दरम्यान ते पुण्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी वाशी टोल नाक्यावर टोल भरला नाही. ३१ तारखेला पुण्यामधल्या मेळाव्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठीची रणनिती जाहीर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, याबाबतची भूमिका ते यावेळी स्पष्ट करतील, असा अंदाज आहे. तसंच मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाके फोडून राज्यभर राडा घातला. राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषणाबद्दल त्यांच्यावर पुण्यात दोन गुन्हे नोंदवण्यात आलेत. आता राज ठाकरेंना पुण्यात अटक होणार का? याची चर्चा सुरु झालीय. 

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.