मेट्रो रेल्वे अपघाताची होणार चौकशी

मुंबई मेट्रो रेल्वे अपघाताची चौकशी होणार आहे. या पुलाच्या मजबुतीविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची चौकशी होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 6, 2012, 04:29 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईत अंधेरी-कुर्ला मार्गावर मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळण्यामागे काय कारण आहे. या अपघाताला कोण आहे, जबाबदार याची चौकशी होणार आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी अभियंती आणि सुपरवाझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेट्रो रेल्वेच्या पुलाचे काम भरपावसात करण्यात येत आहे. पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम पावसात सुरू ठेवणे अपघाताला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. ज्या स्कॅफोल्डिंगच्या (परांती) आधारे हे काम सुरू होते त्यांच्या मजबुतीविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. पुलाचा स्लॅब कसा कोसळला. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, याची चौकशी होणार आहे.
मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनच्या पुलाचा स्लॅब कोसळून मंगळवारी एक कामगार ठार तर सोळा जण जखमी झाले. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू होते. बुधवारी पावसातात काम बंद ठेवण्याची गरज होती. परंतु तसे केले गेले नाही. पंधरा मीटर उंच आणि सहा मीटर रुंद अशा परांतीवर काम सुरू असतानाच स्लॅब कोसळला आणि त्यावर काम करणारे सतरा कामगारही कोसळले. त्यांच्यापैकी उमेश साहू या कर्मचाऱ्याचे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
गंभीर जखमींना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळल्याचे अतिरिक्त महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले. मृतांचे कुटुंबीय आणि जखमींना भरपाई देण्याची जबाबदारी एचसीसी या कंत्राटदार कंपनीची असून करारातील अटींनुसार ती दिली जाईल , असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने आयआयटीतील प्राध्यापक के.बी.के. राव आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे चीफ इंजिनीअर एस.बी. तामसेकर यांची द्विसदस्यीय समिती नेमली आहे.
दरम्यान, मुंबईतील मेट्रो मार्गावर सुरू असलेल्या कामांची सुरक्षा पाहणी पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करू नये , असे एमएमआरडीएने मुंबई मेट्रो वन कंपनीस कळवले असल्याचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी म्हटले आहे.