राज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट

राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा  खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2017, 04:05 PM IST
राज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट title=

मुंबई : राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा  खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय

राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी एटीएम बाहेर पैसे संपल्याचेच फलक दिसत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची अनेक बॅंकांची तक्रार आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई, ठाणे, कोकण तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बँकांच्या एटीएम मशीनमध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. नोटाबंदीनंतर सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा बँक ग्राहक, व्यापारी, नागरिक यांना पुन्हा नोटाटंचाईची झळ तीव्रपणे जाणवू लागली आहे.

एटीएमसमोर आऊट ऑफ कॅश तसेच रोकड संपली आहे, क्षमस्व असे फलक लटकविण्यात आले आहेत. रोख पुरवठय़ाचे प्रमाण  मागणीपेक्षा कमी असल्याने हा प्रसंग उद्भवल्याचे बँकेच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

मुंबईत अनेक ठिकाणी, ठाणे, पुणे तसेच कोकणात रत्नागिरीत तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या चारही जिल्हयांत एटीएम मशिनमध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. 

दरम्यान, अपवाद वगळता ज्या एटीएममध्ये रोकड आहे तेथे रांगा दिसत आहे. मात्र, तेथे पुरेसे पैसे नसल्याने तेथीलही कॅश संपली आहे. करन्सी चेस्टकडून पुरेसा रोकड पुरवठा होत नसल्याने एटीएम कोरडी पडल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

एटीएममध्ये पैसे नसल्याचा प्रकार सर्वात आधी खासगी बँकांसंदर्भात घडला. यानंतर राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांची एटीएम रिकामी आहेत.