भास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर

दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2013, 01:37 PM IST

www.24taas.com,मुंबई
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
भास्कर जाधव यांनी मुलगा आणि मुलीच्या विवाहात लाखों रूपयांचा खर्च केला होता. यावर शरद पवारांनी जाधव यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यात दुष्काळ असताना विवाहावर असा पैचा उधळण्याची गरज नव्हती असे म्हटलेय. त्यामुळे जाधव यांना लग्नसोहळा चांगलाच महागात पडला आहे. जाधव यांचा राजीनामा घेणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या शाही लग्न सोहळ्यासाठी मोठा मंडप साकारण्यात आला असून त्याच्या सजावटीवर पाण्यासारखा पैसा ओतला. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ पडल्यामुळं तिथल्या जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असताना मंत्री महोदयांनी ७० हजार नागरिकांच्या भोजनाचा बेत रचला होता. त्यामुळे टीका होवू लागलीय.
दुष्काळी भागासाठी पै-पैची मदत व्यक्ती, संस्था, देवस्थानं करत आहेत. याचा आदर्श घेण्याऐवजी मंत्री शाही लग्न सोहळ्यावर लाखोंचा चुराडा करतायत. हा संदेश जनतेत गेल्याने राष्ट्रवादी पक्ष अस्वस्थ झालाय. त्यामुळे पवारांना याची दखल घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.