भास्कर जाधवांचा तोल सुटला, हीना गावितांवर व्यक्तिगत टीका

हीना गावित या अविवाहित असल्यामुळे त्यांचे निर्णय वडील विजयकुमार गावित यांनीच घेतला असणार, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2014, 06:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हीना गावित या अविवाहित असल्यामुळे त्यांचे निर्णय वडील विजयकुमार गावित यांनीच घेतला असणार, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरण्यातील पाण्यावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सर्व बाजूने टीका झाल्यानंतर जाहीर माफी मागितली होती. तसेच त्यांनी याची प्रायचित्य म्हणून आत्मक्लेश केले. तरीही राष्ट्रवादी नेत्यांकडून वादग्रस्त आणि बेजबाबदार व्यक्तव्य करण्यात येत आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर खुद्द प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी असे विधान केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे.
हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना नंदूरबारमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या शिफारशीनंतर विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून तडकाफडकी काढण्याचा निर्णय घेतला. तो आमलातही आणला गेला. तरीही मी राष्ट्रवादीचाच आहे, असं गावित सांगत असल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळली. १७ तारखेला मावळमध्ये आणि २४ तारखेला मुंबईत मतदान करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करून टाकलं..बोटावरची शाई कशी पुसायची हे तुम्हाला ठाऊक आहेच असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घाटकोपरमध्ये ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या निर्धार मेळाव्याचं आय़ोजन करण्यात आलं होतं. तिथे खेडचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी ही मुक्ताफळं उधळली. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. या विधानांबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी ती फक्त गंमत होती, अशी सारवासारव केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.