जैतापूर प्रकल्प होणारच - एकनाथ खडसे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण होईल, अशी घोषणा आज विधानपरिषदेचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

Updated: Apr 7, 2015, 04:18 PM IST
जैतापूर प्रकल्प होणारच -  एकनाथ खडसे  title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण होईल, अशी घोषणा आज विधानपरिषदेचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेना आणि भाजपची काही वेगळी भूमिका असली तरी आम्ही ती समन्वयाने सोडवू . जैतापूर प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका असेल असं खडसे यांनी स्पष्ट केलंय.

जैतापूर प्रकल्पासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न विचारण्यात आला होता. जैतापूर प्रकल्पाबाबत सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप, प्रश्न उपस्थित करण्याऱ्या जयंतराव जाधव यांनी केला. सरकारमध्ये मतभेत असतील, सत्तेत सहभागी असलेली शिवसेना जर आंदोलन करत असेल तर प्रकल्प होणार की नाही, अशी विचारणा निरोधी पक्षांनी केली. 

तेव्हा हा प्रकल्प केंद्राचा असून याचे भूसंपादन हे मार्च २०१० ला पूर्ण झाले असल्याचं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांची सरकारमधील मतभेदाबद्दलची टीका सुरुच राहिली. तेव्हा सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी प्रकल्प होणार असल्याचं सांगत सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.