मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!

मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.

Updated: Mar 23, 2016, 02:03 PM IST
मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण! title=

मुंबई : मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.

बेगम खान, शब्बू शेख आणि अफसाना शेख अशी त्यांची नावं आहेत. अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्याकडून १४ मोबाईल आणि २ लेडीज पर्स जप्त केल्यात.

या तिघी मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. कामानिमित्त मुंबई, दिल्ली, बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांत जातोय, असं सांगून या तिघी फक्त मोबाईल चोरी करण्याकरता देशाच्या दौऱ्यावर निघायाच्या.

तिथे रेल्वे स्थानकाजवळच एखाद्या हॉटेल किंवा लॉजमध्ये काही दिवसांकरता त्या रुम घ्यायच्या. तिथे त्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल आणि पर्स चोरायच्या...

अशा प्रकारे लाख, दोन लाख रुपये जमले की त्या दुसऱ्या शहराकडे या तिघी आपला मोर्चा वळवायच्या. मुंबईतल्या लोकल ट्रेनमधल्या चोरीनंतर या तिघींचं पुढचं टार्गेट होतं ते दिल्लीची मेट्रो ट्रेन... मात्र, महिलांच्या रेल्वे डब्यात मोबाईल चोरी करुन पळताना पोलिसांनी या तिघींना रंगेहात पकडलं. त्यातून त्यांचं बिंग फुटलं.