तुकडे करायला महाराष्ट्र केक वाटला का ?

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अखंड महाराष्ट्राचा सूर आळवला.

Updated: Apr 8, 2016, 09:28 PM IST
तुकडे करायला महाराष्ट्र केक वाटला का ? title=

मुंबई: शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अखंड महाराष्ट्राचा सूर आळवला. विदर्भ स्वतंत्र करा, मराठवाडा स्वतंत्र करा म्हणणाऱ्यांवर राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. 

तुकडे करायला महाराष्ट्र केक आहे का ? कोणीही यावं आणि बकाबका खावं असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप, आरएसएस आणि श्रीहरी अणेंना लक्ष्य केलं. 

राज्याचे तुकडे करायचे असतील तर संघानं गुजरात तोडावा, असंही राज ठाकरे म्हणालेत. झेपत नसेल तर खूर्ची खाली करा, पण महाराष्ट्र तोडून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्याला एवढे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मिळाले तरी विकास का झाला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

या सभेमध्ये राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे. माणूस चांगला आहे, अजात शत्रू आहे, मग कॉम्प्युटर क्लास टाका, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. फडणवीस वर्गाचे मॉनेटर वाटतात, असा शाब्दिक चिमटाही राज ठाकरेंनी काढला.