कांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले

कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.
नाशिकमध्ये सध्या कांद्याबरोबर टोमॅटोही भाव खाऊ लागले आहेत. टोमॅटोचे किरकोळ बाजारतील दर पन्नास रुपये किलोवर पोहोचले असून कृषी उत्पन्न बाजारसमितीतही जाळीचे दर वधारले आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने आवक कमी झाल्याने दर वधारले आहेत. नोव्हेंबर महिना हा टोमॅटोच्या मालाचा हंगाम असतो. या हंगामात दरवर्षी ८० ते ९० टक्के टोमॅटो माल विक्रीसाठी येत असतो. मात्र पावसामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाल्याने तसेच रोपे पाण्यामुळे जळाल्याने आवक घटली आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत बटाट्याचे दर किलोमागे १५ ते २० रूपये होते. मात्र ते आता २५ रूपये किलोवर पोहोचलेत. अतिवृष्टीमुळे बटाट्याच्या पिकाचे नुकसान झाले असून, बाजारात कमी बटाटा आल्याने भाव वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलीय. सध्या कांदा ७० रूपये किलो, टोमॅटो ४० रूपये किलो आणि बटाटा २५ रूपये किलो झाल्याने ग्राहक रडकुंडीला आलेत. बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.