`नाच गं घुमा`... माधवी देसाई यांचं निधन!

जेष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे वृद्धापकाळानं बेळगावमध्ये निधन झालंय. त्याचं वय ८० होतं. पहाटे साडेचार वाजता त्यांचं निधन झालं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 15, 2013, 11:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बेळगाव
जेष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे वृद्धापकाळानं बेळगावमध्ये निधन झालंय. त्याचं वय ८० होतं. पहाटे साडेचार वाजता त्यांचं निधन झालं.
‘नाच गं घुमा’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे. माधवी देसाई या भालजी पेंढारकर यांच्या कन्या होत्या. कथा, कांदबरी आणि ललित लेखनात माधवी देसाई यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यांच्या निधनामुळं साहित्यविश्वात शोककळा पसरलीय.
माधवी ताई बरेच वर्षे गोव्यातही राहत होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामूळे बेळगावमध्ये त्यांची कन्या मिरा तारळेकर यांच्या घरी राहत होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे सोमवारी सकाळी साडेचार वाजता निधन झाले. बेळगावमध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी त्यांचा सखोल अभ्यास होता. बेळगावच्या करोली गावात पहिले सीमावर्ती मराठी साहित्य संमेलन भरवण्यात त्यांची भूमिका मोठी होती. त्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे आज सीमावर्ती भागात ठिकठिकाणी मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येत आहे.

माधवी ताई यांचे पती रणजित देसाई यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांवर आधारित ‘नाच गं घुमा’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे. सोलापूरमधील भैरुरतन दमानी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्याशिवाय सीमावर्ती भागातील अनेक साहित्य क्षेत्रातील पुरस्कार त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल मिळाले आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.