‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश

पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील शेतकऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आलंय. रांजणगाव ‘एमआयडीसी’साठी केलेल्या भूसंपादनाविरोधात त्यांचा लढा सुरु होता. त्याला अखेर यश मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.

Updated: Sep 16, 2014, 10:28 AM IST
‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश title=

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील शेतकऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आलंय. रांजणगाव ‘एमआयडीसी’साठी केलेल्या भूसंपादनाविरोधात त्यांचा लढा सुरु होता. त्याला अखेर यश मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीच्या ‘टप्पा-३’साठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर १२ वर्षांच्या लढ्यानंतर यश आलयं. बाभूळसर, करडे आणि कारेगाव या तीन गावांमधील शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

रांजणगाव एमआयडीसीच्या प्रस्तावित संपादित क्षेत्रातून सुमारे दोन हजार एकर क्षेत्र वगळण्याचा महत्त्वूर्ण निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे, ही माहिती विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

प्रस्तावित भूसंपादनामुळे ८५४ कुटुंबे बाधित होणार होती. त्यामुळे या भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी १२ वर्षांपूर्वी कृती समिती स्थापन केली आणि तेव्हापासून या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. 

या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सात-बारा उताऱ्यावरील एमआयडीसीचा शिक्का आता रद्द होणार आहे. दरम्यान, शासकीय निर्णय झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी अजून किती दिवस लागणार, हा खरा प्रश्न आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.