'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही'

सांगली जिल्ह्याच्या खिरवडे गावातल्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिलाय.

Updated: Apr 14, 2015, 09:24 PM IST
'हा जातीभेद नाही; पण, दलितांना पाण्याचा हक्क नाही' title=

सांगली : सांगली जिल्ह्याच्या खिरवडे गावातल्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिलाय.

पिण्यासाठी बोअरचं गढूळ पाणी... गावात विहीर असूनही 27 वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष... ही व्यथा आहे सांगली जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलितांची... दोन हजार दोनशे लोकसंख्या असलेल्या या गावात अडीचशे जणांची दलित वस्ती आहे. या लोकांसाठी गेल्या वर्षी राष्ट्रीय पेय योजनेंतर्गत विशेष घटक पाणीयोजना मंजूर करण्यात आली. डोंगर पायथ्याला असलेल्या तलावातून विहीरीत येणारे पाणी टाकीद्वारे या वस्तीसाठी देण्याची ही योजना... मात्र, योजनेचे काम करण्यास येणाऱ्या लोकांना तथाकथित अपप्रवृत्ती विरोध करत असल्याचा आरोप या दलित बांधवांनी केलाय.
 
दुसरीकडे, 'गावात जातीभेद नाही... पण, दलित वस्तीसाठी असणाऱ्या पाणी योजनेला विरोध असणारच' असं प्रमोद पाटील नावाच्या ग्रामस्थानं म्हटलंय.
 
या पाणी योजनेत कोणताही बदल न करता पूर्ण करण्याचं आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी बी पाटील देतायत.

याच पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा संघर्ष केला. मात्र, आजही याच पाण्यासाठी २७ वर्ष संघर्ष करावा लागणं याहून मोठी शोकांतिका ती कोणती...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.