धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी

 धुळे - नागपूर - सुरत महामार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडलाय. या अपघातात १५ जण जागीच ठार झालेत. 

Updated: Jun 24, 2016, 09:27 PM IST
धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी title=

धुळे : धुळे - नागपूर - सुरत महामार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडलाय. या अपघातात १५ जण जागीच ठार झालेत. 

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वडाप आणि कंटेनरची धडक झाल्यामुळे हा अपघात घडलाय. सोबतच, बाजुला असलेल्या बाईकस्वारालाही ही धडक बसली. या अपतातात १५ जणांनी जागीच आपले प्राण गमावलेत. मृतांमध्ये  ९ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात या १५ जणांचे मृतदेह हलवण्यात आलेत. तसंच या अपघातात चार जण गंभीर जखमी झालेत.  

अवैध वाहतूक पडली महागात

काळी-पिवळी वडाप धुळ्याकडे येत असताना हा अपघात झाला. काळी-पिवळीमध्ये ८-१० प्रवासी वाहतुकीची क्षमता असते... पण, या काळी-पिवळीमध्ये मात्रा १०-१५ लोक प्रवास करत होते. 

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी उपस्थित झालेत. दरम्यान, पाऊसही जोरदार असल्यानं अपघातग्रस्तांच्या मदतीलाही अडथळा येत होता... तसंच यामुळे महामार्गावर वाहतुकीचीही कोंडी पाहायला मिळाली.  

महामार्गाचं रुंदीकरण कधी?

या महामार्गाच्या रुंदीकरणाची चर्चा नेहमीच होत असते. परंतु, अद्याप मात्र काम सुरू झालेलं नाही. या महामार्गावर याआधीही अशाच अपघातांत अनेकांनी आपले जीव गमावलेत.