बारावीचे पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल, पण पेपरफुटी नाही....

बारावीचे पेपर्स व्हॉट्सअॅपच्या  माध्यमातून व्हायरल होत असल्याचं राज्य शिक्षण मंडळानं मान्य केलय. मात्र हा प्रकार म्हणजे पेपरफुटी नसल्याचा मंडळाच्या अध्यक्षांचा दावा आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 6, 2017, 05:35 PM IST
बारावीचे पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल, पण पेपरफुटी नाही.... title=

पुणे : बारावीचे पेपर्स व्हॉट्सअॅपच्या  माध्यमातून व्हायरल होत असल्याचं राज्य शिक्षण मंडळानं मान्य केलय. मात्र हा प्रकार म्हणजे पेपरफुटी नसल्याचा मंडळाच्या अध्यक्षांचा दावा आहे. 

बारावीचा पेपर कुठूनतरी बाहेर येतो, मात्र तोपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रात बसलेले असतात. तरीदेखील या घटनांची दखल घेऊन पोलिसांच्या सायबर सेलकडे गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं . त्याचप्रमाणे परीक्षाकेंद्रावर विद्यार्थ्यांकडे मोबाईल असणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असल्याचं अध्यक्ष गंगाधर म्हमाणे  यांनी सांगितलं. 

पेपर वाटल्यानंतर तो व्हॉट्सअॅपवर गेल्याप्रकरणी 2 विद्यार्थी संशयित आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्याची परीक्षा झाली की त्याला पोलीस ताब्यात घेतील, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साांगितले . 

पेपर एक दिवस आधी फुटला यात तथ्य नाही, मुलं परीक्षेला बसल्यानंतर पेपर व्हॉटसअॅपवर आला असल्याचं स्पष्ट झालंय, असेही तावडे म्हटले आहे. 

राज्यात उद्यापासून (मंगळवार दिं ७ मार्च ) दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यातील २१ हजार ६८६ शाळांतील १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. त्यामध्ये ९ लाख ८९ हजार ९०८ विद्यार्थी आहेत, तर ७ लाख ७६ हजार १९० विद्यार्थिनी आहेत. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनीचे प्रमाण जवळ जवळ २ लाखांनी कमी आहे. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी वेळापत्रकात महत्वाच्या विषयांच्या पेपर पूर्वी किमान एक दिवसाचा खंड देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर समुपदेशक देखील उपलब्ध असणार आहेत.