कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान

कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Updated: Oct 2, 2014, 07:28 PM IST
कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान title=

कु़डाळ : कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्यात ही लढत रंगणार आहे.

या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. 

राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष आणि चार अपक्ष उमेदवार मिळून नऊ जणांनी अर्ज भरले, तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे नारायण राणे आणि शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

या मतदारसंघात काँगे्रसकडून नारायण राणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोर वाढला असून जोमात प्रचार सुरू आहे.

२००९ ची विधानसभा निवडणूक पराभूत होऊनही गेली पाच वर्षे येथील मतदारसंघात ठाण मांडून जनसंपर्क वाढविणारे वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रचाराचा जोर वाढविला आहे. 

आघाडी आणि युती शेवटच्या क्षणी तुटल्यावर उमेदवारी अर्ज भाजपा आणि राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवार देत भरण्यात आला. मात्र, या दोन्हीही पक्षांकडून अजूनही शांत आणि अत्यंत धिम्या गतीने प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे.

भाजपा व राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढत असले, तरी राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत आणि भाजपाचे विष्णू मोंडकर यांना जनतेची मते आपल्याकडे टिकविण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. 

मोठ्या प्रचार सभा घेणे, कॉर्नर सभा घेणे याकडे काँग्रेस, शिवसेना आणि इतर पक्षांनी टाळले असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गावातील वाडीवस्त्यांवर जात जोरदार प्रचार करीत असून प्रत्येकजण एका एका मताच्या विचार करीत आहे.

कुडाळ मतदारसंघात सुमारे २ लाख ३ हजार मतदार असून कुडाळ आणि मालवण हे दोन तालुके येतात. गेल्या लोकसभेत सुमारे ७६ टक्के मतदान या मतदारसंघात झाले. 

या विधानसभेला नवीन आणि अगोदरचे मतदार मिळून ८० टक्केच्या वर मतदान होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्षांकडून मतदारांवर विकासकामांच्या आश्वासनांची खैरात सुरू आहे.

सत्ताधारी पक्षाकडून प्रचारात झालेली विकासकामे, दिलेला निधी व सत्ता आल्यास करण्यात येणारी विकासकामे या मुद्द्यांवर प्रचारात भर दिला जाणार आहे. तर विरोधकांकडून या मतदारसंघातील समस्या आणि सत्ताधाऱ्यांकडून रखडलेली विकास कामे यावर अधिक भर दिला जाणार आहे.

राणेंसमोर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचे तगडे आव्हान असल्यामुळे राणेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.