`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`

‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 28, 2012, 01:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे नेते मुक्तार अब्बास नक्वी यांनी केलीय.
झी न्यूजशी बोलताना शरद यादव यांनी संताप व्यक्त केलाय. ‘पोलिसांची ही एकतर्फी कारवाई असून देशातल्या एका चॅनलनं नाही तर हे प्रकरण सगळ्या मीडियानं उचलून धरलंय. देशातलं कोणतंच चॅनल नाही ज्यानं या प्रकरणाला दाखवलेलं नाही. शेवटी न्याय हा होतोच. गुन्हा सिद्धही व्हायला हवाय’ असं म्हणत ‘सरकारनं एका चॅनलवर कारवाई का केलीय सगळ्या मीडियावरच करावी, असा टोला शरद यादव यांनी हाणलाय. त्याचसोबत पुढेही सरकारला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत, असा इशारा देत आपण हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तर, काँग्रेस खासदार आणि केंद्रातल्या सरकारनं मीडियाची मुस्कटदाबी करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप भाजप नेते मुक्तार अब्बास नकवी यांनी केलाय. ‘झी’च्या संपादकांवर केलेल्या कारवाईचा त्यांनी निषेध केलाय. काँग्रेस सरकारनं केलेल्या घोटाळे माध्यमांनी बाहेर काढू नयेत, हा संदेश देण्यासाठीच ही हुकूमशाही पद्धतीन कारवाई केल्याचा आरोप नक्वी यांनी केलाय. माध्यमांना घोटाळे जनतेपर्यंत पोहचवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांवरच गदा आणण्याचा हा डाव असल्याचंही नकवी यांनी म्हटलंय.