भ्रष्टाचार आणि महागाईला लगाम घाला – राहुल गांधी

आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 27, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भ्रष्टाचाराला लगाम घाला आणि आपापल्या राज्यातली महागाई कमी करा, असा कानमंत्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना दिलाय.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर प्रथमच काँग्रेसची पहिलीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला 12 काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
गेल्याच आठवड्यात कॅबिनेटनं आदर्शचा अहवाल फेटाळला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. तेव्हाच ही राहुल गांधींची भूमिका असू शकेल, अशी शंका व्यक्त केली गेली होती.
आज दिल्लीत सर्व काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या युवराजांनी आदर्श अहवालाबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्री चव्हाण यांना दिला. युवराजांचा सल्ला हा आदेश मानण्याची परंपरा काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.