दिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 11, 2013, 08:26 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.
या प्रकरणातील एका आरोपीनं तुरुंगातच आत्महत्या केली असून सहावा आरोपी बालगुन्हेगार असल्यानं त्याला कोर्टानं याआधीच तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येशिवाय मुकेश (वय 26), विनय शर्मा (20), पवन गुप्ता (19) व अक्षय सिंह ठाकूर (28) या चौघांना हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक शारीरिक संबंध, दरोडा, पुरावे नष्ट करणे, कट रचणे, अपहरण किंवा हत्येच्या उद्देशाने पळवून नेणे, या आरोपांखाली दोषी ठरविले, तर दरोड्यातील खुनाच्या आरोपातून दोषमुक्त केले. न्यायालयाने दोषी ठरविताच पवन ढसाढसा रडू लागला, तर विनयला मोठा धक्काे बसल्याचे दिसत होते. "आम्ही जे काय केले, त्याच्या परिणामांना तोंड देऊ,`` असे मुकेश पुटपुटताना ऐकण्यात आले. चौथा आरोपी अक्षयवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. २३० पानी निकालपत्राचं वाचन करण्यापूर्वी न्यायाधीशांनी दिल्ली पोलिसांना धन्यवाद दिले.
दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात ही घटना घडली होती. घरी परतणाऱ्या एका २३ वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर आणि तिच्या मित्रावर चालत्या बसमध्ये हल्ला झाला होता. या तरुणीवर बलात्कार करून, तसंच तिच्या मित्राला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून रस्त्यावर फेकण्यात आलं होतं. या घटनेनंतर काही दिवसांनी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालकासह सहा नराधमांना अटक करण्यात आली होती.
पीडित तरुणीला उपचार मिळण्यात झालेला विलंब आणि हॉस्पिटलात उपचार सुरू असताना झालेलं इन्फेक्शन यामुळं तिचा मृत्यू झाल्याचा आरोपींचा दावा कोर्टानं फेटाळलाय.
बलात्कारावर आम्ही कठोर कायदा बनविला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांतील दोषींना आतापासून भविष्यात फाशीचीच शिक्षा दिली जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.