रांचीत धोनीनं `जिंकून दाखवलं` इंग्लंड बॅकफूटवर

रांची वन-डेमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 विकेट्सने मात केली आहे. या विजयासह भारताने 5 वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे.

Updated: Jan 19, 2013, 06:30 PM IST

www.24taas.com, रांची
रांची वन-डेमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 विकेट्सने मात केली आहे. या विजयासह भारताने 5 वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहली नॉटआऊट 77 रन्सची मॅचविनिंग खेळली. त्याच्या धडाकेबाज बॅटिंगमुळे टीम इंडियाला इंग्लंडने ठेवलेलं 156 रन्सचं टार्गेट सहज पार करता आलं. गेल्या काही मॅचेसमध्ये विराटची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. अखेर त्याला सुर गवसला आणि त्याने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली आहे. रांचीमध्ये पहिल्यांदाच मॅच झाली आणि आपल्या होम ग्राऊंडवर धोनीनं विजयी सलामी देण्याची किमया साधली.

रांची वन-डेमध्ये अजिंक्य रहाणेची विकेट झटपट गमावल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरने टीम इंडियाची इनिंग सावरली होती. मात्र गौतम गंभीर 33 रन्सवर आऊट झाला. कोहली आणि गंभीरने 67 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. त्यानंतर विराट कोहलीनं वन-डेमधील 22 वी हाफ सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान, गेल्या काही मॅचेसमध्ये निराशाजनक कामगिरी करणा-या विराट कोहलीला अखेर सुर गवसला आहे. त्यामुळे भारतीय गोटात आनंदाचं वातावरण आहे. आता इंग्लंडनं ठेवलेलं 156 रन्सच माफक आव्हान झटपट पार करण्यात धोनीची टीम यशस्वी झाली आहे.
रांची वन-डेत कॅप्टन धोनीने टॉस जिंकून घेतलेला फिल्डिंगचा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला....इंग्लंडला फक्त १५५ रनमध्ये रोखण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. इंग्लंडची ओपनिंग लवकर फोडण्यात शमी अहमदला यश आल्यानंतर ठराविक अंतराने भारताच्या बॉलर्सने इंग्लंडच्या बॅट्समनला आऊट केल. ऍलिस्टर कूक १७, ईयान बेल २५, कविन पीटरसन १७, ख्रिस किस्वेटर १० रन्सवर आऊट झाले. समित पटेल खातही न उघडता माघारी परतला. भारताकडून रविंद्र जाडेजाने 3 विकेट्स घेतल्या. ईशांत शर्मा आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शमी अहमद, भुवनेश्वरने एक-एक विकेट घेतली.