हा संप संपणार तरी कधी ?...

एअर इंडियाच्या पायलट गिल्डची उद्या नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान एअर इंडियाच्या पायलट गिल्डने पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे.

Updated: May 13, 2012, 02:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

एअर इंडियाच्या पायलट गिल्डची उद्या नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान एअर इंडियाच्या पायलट गिल्डने पुकारलेल्या संपाचा आज सहावा दिवस आहे. संपामुळं आतापर्यंत ७१ पायल्टसना बडतर्फ करण्यात आलं आहे. संपामुळे दिल्ली आणि मुंबईतून १६ उड्डाणं रद्द करण्यात आली.

 

पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी वरिष्ठ पायलट्सनी केली आहे. संप सुरु राहिल्यानं हजारो हवाई प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. संपातून मार्ग न निघाल्यानं नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांनी काल पंतप्रधानांशी याबाबत चर्चा केली. संपातून लगेच मार्ग निघणार नसल्याची चिन्हे सध्या दिसत आहे.

 

एअर इंडिया प्रशासनानं संप मिटविण्यासाठी बोलवल्यास यातून नक्कीच मार्ग निघेल. अशी आशा पायलट गिल्डनं व्यक्त केली आहे. दरम्यान परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकार निवृत्त पायलटना बोलविण्याच्या विचारात आहे. तसंच भाडेतत्वावर पायलट घेण्याचा विचारही करण्यात येतो आहे.