राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत  

Updated: Apr 27, 2022, 09:09 PM IST
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा title=

Corona Update : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची (Corona Fourth Wave) शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी  स्वत: हून मास्क वापरणं, लस घेणं अपरिहार्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी म्हटल आहे. 

राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास  त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग (RTPCR Testing) करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

कोविड संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड (Covid-19) रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त,  जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला.  

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घेणे आवश्यक
कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणु जन्माला येत आहेत. चीनमध्ये 40 कोटी जनता सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावलं आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले.

या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनकूल वर्तणूक अंगिकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

लसीकरण सक्तीचे करा, केंद्र शासनाकडे मागणी करणार
आपण केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देतांना 9 महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.   

18 ते 59 या वयोगटातील  नागरिकांना शासकीय रुग्णालयातून बुस्टर डोस देण्याबाबतचा शासन विचार करत असल्याचंही ते म्हणाले. 

राज्यात टेस्टिंग वाढवण्याची गरज
राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी टेस्टिंग वाढवण्याची गरज असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिल्या. त्यांनी जनजागृती मोहीम पुन्हा एकदा नव्याने राबवावी, राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्याचे काम वरचढ राहील यादृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत, आरोग्य संस्थांमधील सर्व सयंत्रांची देखभाल दुरुस्ती करतांना फायर ऑडिटचे काम ही पूर्णत्वाला न्यावे असेही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.