हायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच

विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास परवानगी नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची अडचण वाढणार 

Updated: Jun 17, 2022, 04:55 PM IST
हायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच title=

Vidhan Parishad Election : मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) राष्ट्रवादी (NCP) आणि मविआला (Mahavikas Aghadi) मोठा झटका दिलाय. राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषदेतही राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदान करता येणार नाही. 

मुंबई हायकोर्टानं दोघांनाही मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादीची हक्काची दोन मतं कमी झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे. तर भाजपचा या निर्णयाचा फायदा होणार असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. 

प्रवीण दरेकर यांचा मविआला टोला
महाविकास आघाडीचा काऊंटडाऊन सुरु झालं असून विधान परिषदेच्या पाचही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीची 2 मतं कमी होणं हे आमच्या विजयाचे शुभसंकेत असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांचा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना बेकायदेशीर रित्या जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे, त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मतदान करण्याचा अधिकाकर लोकशाहीने दिला आहे, संसदीय लोकशाहीलाच टाळं लावण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. 

मविआमध्येच मतांची पळवापळवी होणार?
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतच मतांची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भिस्त शिवसेनेच्या अपक्ष समर्थक आमदारांवर आहे. त्यामुळे या आमदारांची मते मिळवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस होण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडे स्वत:चा मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर 8 मतं अतिरिक्त आहेत. त्यामुळे या मतांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नजर आहे. राष्ट्रवादीला तीन तर काँग्रेसला 10 मतांची गरज आहे. तर शिवसेनेकडे अतिरिक्त मतं नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.