खोटी सहानुभूती दाखवायची नव्हती म्हणून दौऱ्यावर गेलो नाही- उद्धव ठाकरे

गुरांवर उपचार करण्यासाठीही शिवसेनेकडून १०० पशुवैद्यकांचे पथक पाठवण्यात आले आहे. 

Updated: Aug 11, 2019, 01:33 PM IST
खोटी सहानुभूती दाखवायची नव्हती म्हणून दौऱ्यावर गेलो नाही- उद्धव ठाकरे title=

मुंबई: सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे काम सुरु आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी शिवसेनेने सांगली आणि कोल्हापूरमध्ये शिवसहाय्य मदत रवाना केल्याचे सांगितले. तसेच पूर ओसरल्यानंतर या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेकडून या भागात डॉक्टरांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याशिवाय, गुरांवर उपचार करण्यासाठीही शिवसेनेकडून १०० पशुवैद्यकांचे पथक पाठवण्यात आले आहे. 

यावेळी पत्रकारांनी उद्धव यांना पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीविषयी विचारण केली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी या वादांमध्ये अडकण्यापेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच उद्धव यांनी गिरीश महाजन यांच्या सेल्फीच्या वादावरही भाष्य करण्यास नकार दिला. शिवसेना आपलं काम करत आहे. मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे उद्धव यांनी म्हटले. 

व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!

तसेच इतक्या दिवसांमध्ये आपण पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर का गेलो नाहीत?, याविषयीही त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

मला पूरग्रस्त लोकांना केवळ कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी दौऱ्यावर गेलो नाही. मात्र, यामध्ये त्याठिकाणी गेलेल्या नेत्यांवर टीका करण्याचा माझा हेतू नाही. शिवसेनेचे काम सुरु आहे. त्यामुळे तुम्ही वादविवाद पेटणार नाहीत, याची काळजी घ्या, असे उद्धव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. पूर ओसरल्यानंतर आपण ते बघुयात, असेही उद्धव यांनी सांगितले.