महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक!

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे.  

Updated: Jun 16, 2020, 07:15 AM IST
महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक! title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज  पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. तर देशात  कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५१ पूर्णांक ७ शतांश टक्के झाले आहे.  देशातल्या एकूण ३ लाख ३२ हजार ४२४ संक्रमितांपैकी १ लाख ६९ हजार ७९७ बरे झाले असून १ लाख ५३ हजार १०६ रुग्ण अद्याप उपचार घेत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. 

राज्यात काल आणखी तीन हजार ३९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या एक लाख सात हजार ९५८ झाली आहे. तर काल या आजाराने १२० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार ९५० कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

तर देशात एका दिवसात आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. तर  कोरोनाची लागण झालेले  ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले. सोमवारी  ३२५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९५२० रुग्ण या आजाराने दगावले आहेत. कोविड-१९ चा फटका बसलेल्या देशांमधे भारत आता चौथ्या क्रमांकावर पोचला आहे. 

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खासगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी  १ लाख १० हजार  ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८९ हजार  १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७,  कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).

सोमवारी नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार – १९, मीरा भाईंदर – १२, नवी मुंबई -१२,  धुळे -१०, ठाणे -११ ,  पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ८, जळगाव – २, जालना -२, पालघर – १,सोलापूर -१ आणि रायगड -१ मृत्यू असे आहेत.