ठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका?

भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याचा तयारीत आहे.

Updated: Dec 4, 2019, 05:45 PM IST
ठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका? title=
संग्रहित छाया

मुंबई : भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याच्या तयारीत आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या ३१० कोटींच्या बँक हमीचा नव्या सरकारकडून फेरआढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान, आमचे सरकार सर्वांसाठी समान न्यायाने वागणार आहे, असे स्पष्टीकरण मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.

भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या हमीवर नव्या सरकारकडून फेरआढावा घेण्यात येणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे आणि सोलापूर जिल्हातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने शेवटच्या कालावधीत ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. 

हा निर्णय रद्द करण्याच्या विचारात नवे सरकार असल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने मदत केली होती. फडणवीस सरकारने शेवटच्या सहा महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा आढावा सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यात या निर्णयाचा समावेश असल्याचे समजते आहे.