IT Raid : '....त्याचीच किंमत तापसी, अनुरागला भोगावी लागतेय'

सगळ्यांनाच पालघीचे भोई होता येत नाही 

Updated: Mar 5, 2021, 11:28 AM IST
IT Raid : '....त्याचीच किंमत तापसी, अनुरागला भोगावी लागतेय' title=

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. बुधवारी आयकर विभागाने यांच्या घरांवर छापे मारून कारवाई केली. 'फँटम' फिल्म या प्रॉडक्शन हाऊसने कर चोरी केल्याच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारला (Saamana Target Modi Government on  Anurag Kashyap, Taapsee Pannu IT Raid) खडेबोल सुनावले आहेत. 

सामनातून मोदी सरकारला खडेबोल 

'देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे होत आहे? केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर 'इन्कम टॅक्स'ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. (IT Raid : अनुराग कश्यप, तापसी पन्नू छापेमारीत ६५० कोटी रुपयांचा गोंधळ)

तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत. मुंबई-पुण्यात ३० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी पन्नू, अनुराग कश्यप हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. एक प्रश्न यामुळे असा निर्माण होतो की, हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा. 

सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं म्हटलं आहे.