'..मग बिहार निवडणुकीत कसं लक्ष घालताय?', रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

राज्यातलं महाविकासआघाडी सरकार बदल्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Updated: Sep 2, 2020, 07:56 PM IST
'..मग बिहार निवडणुकीत कसं लक्ष घालताय?', रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातलं महाविकासआघाडी सरकार बदल्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत, असं ते बोलतायत, मग आम्हीही म्हणतो की, राज्य जेव्हा अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसं काय लक्ष घालू शकतात?', असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. तसंच त्यांना राजकीय वक्तव्य करण्याची सवय आहे, असंही रोहित पवार म्हणाले. 

कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, त्यांनी तसं कबूल केलंय. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत मध्यप्रदेश सरकारने विश्वासात घेतलं नसल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. 

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणताय, मग पंतप्रधान कुठे आहेत? तेदेखील ऑफिसमध्ये बसूनच काम करत आहेत ना?, असं टोलाही रोहित पवारांनी हाणला. जीएसटीचा फंड मिळत नसतानाही सरकार चांगलं काम करत असल्याची पोचपावती रोहित पवारांनी दिली. 

पुण्यामध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. वेळेमध्ये ऍम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे रायकर यांना जीव गमवावा लागला. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. पांडुरंग रायकर यांच्याबाबत जे झालं ते वाईट झालं, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जे झालं ते चुकीचं झालं, यात शहानिशा करण्याची गरज आहे आणि त्याबाबत अजितदादांनी आदेश दिले आहेत, असं रोहित पवार म्हणाले.