महाआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan suicide case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे.

Updated: Feb 16, 2021, 12:47 PM IST
महाआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव   title=

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan suicide case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राजीनाम्यासाठी शिवसेनेतील (Shiv Sena) एक गट आग्रही आहे. त्यामुळे राठोड राजीनामा देणार की त्यांना पक्षाकडून अभय मिळणार याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राजीनाम्याबाबत  माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. (Rising pressure for Forest Minister Sanjay Rathod's resignation) 

पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यसरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे विरोधकांचा वाढता दबाव आणि दुसरीकडे संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी वाढता दबाव पक्षातून वाढत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राठोड यांनी राजीनामा दिलेला नसला तरी शिवसेनेतील एक गट राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे. संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबंधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत. 

अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक असून त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी सोडून बाकी इतर विषय नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणानंतर आठ दिवसांनी पूजाच्या वडिलांनी मीडियाला प्रतिक्रीया दिल्यानंतर, राजकीय वतृळातूनही आता प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रीया देताना, पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणाचं राजकारण करणं चुकीचं असून, महाराष्ट्र नेहमीच स्त्रीयांच्या आणि न्यायाच्या बाजूनं उभा राहतो असं म्हटलं आहे. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बीडची शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बंजारा समाजाची बदनामी थांबवण्याची यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. यावेळी, भाजप आमदार अतुल भातकळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.